व्हिवा जुलै ४
बीए च्या दुस-या वर्षाला असलेला चेतन आणि त्याची आई, दोघेही काहीसे टेन्स
होते. चेतनच्या आणि त्याच्या बाबांच्या रोजच्या वादविवादांना आई कंटाळली होती. वाद
तिचेही व्हायचे चेतनशी, नाही असं नाही. पण आजकाल का कोण जाणे, बाबांना त्याचं काही
म्हणता काही पटत नव्हतं. साधं काही तरी बोलायला सुरुवात झाली तरी त्याचं पर्यवसान
भांडणात व्हायचं. आईची मध्यस्थी करताना पुरेवाट व्हायची. मग जितकं शक्य होईल तितका
चेतन बाबांना टाळायचा प्रयत्न करायचा. काही निरोप सांगायचा झाला तर तो आईतर्फे
सांगायचा, जेवणाचं ताट रुममध्ये घेऊन जायचं असं काहीतरी करायचा. बाबांचा राग मग
आणखीनच वाढायचा.
बारावीला तसे चांगले मार्क्स पडले होते त्याला. पण त्यानं ठरवलं होतं स्पर्धा
परीक्षा द्यायच्या. म्हणून बीए ला अॅडमिशन
घेतली. बाबांना हे काही फारसं पटलं नव्हतं. त्यावरून नेहमी वाद व्हायचे. शिवाय
त्याची अस्ताव्यस्त रूम, जुने, फाटके कपडे घालणं, उशिरा उठणं, वाट्टेल तेव्हा खाणं
हे सगळंच असह्य व्हायचं त्यांना. किती नाही म्हटलं तरी ‘आम्ही तुझ्या वयाचे
असताना....’ असा डायलॉगही यायचा अधूनमधून तोंडात. ‘अरे काहीतरी शिस्त लाव स्वत:ला,
जरा घराकडे लक्ष दे, आईला मदत कर’ ते चेतनला सांगायचा प्रयत्न करायचे.
खरंतर मुलगा जन्माला येतो तेव्हा अगदी आनंदोत्सव साजरा केलं जातो. वंशाचा
दिवा, कुलदीपक, घराण्याचं नाव चालवणारा राजकुमार अशी अनेक विशेषणं त्याला लावली
जातात. मग नव्याची नवलाई संपते. बाबा कामाला जायला लागतात. मुलगा हळूहळू मोठा
होतो. संध्याकाळी कामावरून दमून आल्यावर मुलाबरोबर बोलणं काय होतं तर ‘अभ्यास
केलास का? आणि आईला त्रास दिला नाहीस ना?’ हसणं, खेळणं विसरून जायला होतं. मुलगा
वयात यायला लागतो, उद्धट, उर्मट उत्तरं द्यायला लागतो. स्वतंत्र होण्याची स्वप्नं
बघायला लागतो. निसर्गाला हवं असतं हे स्वातंत्र्य. त्याशिवाय शिकणार कसे तुम्ही या
जगात एकटे रहायला? हे बदललेलं समीकरण पटायला जड असतं आईबाबांना. गप्पा बिप्पा
राहतात बाजूला, फक्त वाद सुरु होतात. शिवाय स्वत:च्या मनातलं प्रेम शब्दांत
सांगायची सवय कुठे असते बाबांना? सतत कमावत्या माणसाच्या, बॉसच्या भूमिकेत रहाणं त्यांच्यासाठीही
काही फार आनंदाचं नसतं. हवेहवेसे वाटणारे बाबा टाळावेसे केव्हापासून वाटायला
लागले? नक्की कधी बदलायला लागलं हे नातं? लक्षातही येत नाही.
बाप-मुलाच्या नात्यावर खूप अभ्यास झालाय. इडीपस कॉम्प्लेक्स, सत्तेसाठी, पॉवरसाठी
स्ट्रगल अशी कारणंही यासाठी दिली गेलीयेत. संवादाचा अभाव हे एक मोठं कारण असावं
असं वाटतंय. शिवाय आपली पारंपारिक पद्धत अशी कि पुरुषांनी बाहेर जाऊन काम करायचं
आणि बायकांनी घरी राहून मुलांकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे वडीलांचं काम काहीसं
रिंगमास्तरसारखं झालंय.
आजची जनरेशन या गोष्टी काही प्रमाणात दुरुस्त करायचा प्रयत्न नक्कीच करतेय.
आजचे बाबा त्यांच्या कठोर मुखवटयातून बाहेर येतायत. मुलांना फक्त धाकात
ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी खेळलं तर जास्त मजा येते हे ते अनुभवतायत. वयात येताना,
मोठे होताना मुलांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करतायत. काहीवेळा अलगद आईच्या
भूमिकेतही शिरतायत. मनातून मुलांवर कितीही प्रेम करत असलो तरी ते शब्दांतून,
कृतीतून त्यांच्यापर्यंत पोचवायला लागतं हे त्यांच्या लक्षात यायला लागलंय.
चेतनला त्यांची ही बाजू समजून घ्यायला लागेल. हळूहळू त्यांच्याशी संवाद
साधायला लागेल. आपल्या वागण्याचा रिव्ह्यू घ्यायला लागेल. आणि हो, आपण बाबा
झाल्यावर कसं वागायचं यावरही विचार होईलच त्याचा यातून.
No comments:
Post a Comment