Thursday, 16 November 2017

भातुकलीचा खेळ

व्हिवा ७ नोव्हेंबर २०१७

     माझ्यासमोर बसलेलं ते जोडपं अगदी त्रस्त होतं. त्यांचं नवीनच लग्न झालेलं होतं, पण ते दिसत होते मध्यमवयीन. शिवाय बोलताना ‘याचा मुलगा’, ‘हिची मुलगी’ असं बोलत होते. मी जरा गोंधळलेच. ‘एक मिनिट, मला जरा पहिल्यापासून नीट सांगाल का सगळं?’ मी म्हटलं. त्यातून मला कळलं ते असं  -  माधवी आणि गौरवचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. दोघांचाही हे दुसरं लग्न. माधवीला नुकतीच कॉलेजमध्ये जायला लागलेली मुलगी होती आणि गौरवला साधारण त्याच वयाचा मुलगा होता. गौरवची नोकरी चांगल्या पगाराची होती. माधवीही जॉब करायची, पण लग्नानंतर या गावात शिफ्ट व्हायला लागल्यामुळे तिनं ती सोडली होती. लग्न करण्याआधी खूप विचार केला होता दोघांनी. ब-याचदा एकमेकांशी बोलून, आपलं छान जमतं याची खात्री झाल्यावरच त्यांनी पुढचं पाऊल उचललं होतं. आपापल्या मुलांना निर्णयात सहभागी करून घेतलं होतं. मुलांनी फार उत्साह दाखवला नाही पण विरोधही केला नाही. लग्न झाल्यावरचे सुरुवातीचे काही दिवस एकमेकांना जोखण्यात गेले. सगळेच एकमेकांशी जपून वागत होते.
  ‘मग आता काय झालंय? तुमचं पटत नाहीये का?’
 या वयात लग्न केल्यावर काहीवेळा फार तडजोड करणं जमत नाही याची कल्पना असल्यामुळे मी विचारलं. ‘नाही हो, आम्ही एकदम कम्फर्टेबल आहोत. पण ही मुलं मात्र आम्हाला सळो की पळो करून सोडतायत. तरी चार चार वेळा विचारून घेतलं होतं आधी. त्यांची सोय व्हावी म्हणूनच हा निर्णय घेतला ना! पण कितीही केलं तरी त्यांना काही जाण नाही त्याची.’
  अशी कुटुंबं पाहणं आता आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही. बदलत्या काळाबरोबर लग्नांची आणि मुलांची वेगवेगळी कॉम्बीनेशन्स दिसायला लागलीयेत. लग्नाच्या नेहमीच्या अपेक्षांमध्ये मुलं, करीयर, प्रॉपर्टी अशा नवीन गोष्टींची भर पडतेय. या लग्नांनंतर प्रत्यक्षात एकत्र राहायची वेळ येते, तेव्हा दोन्ही कुटुंबांना त्यांचे पूर्वीच्या घरामधले अनुभव आठवायला लागतात.  एकमेकांच्या कितीतरी लहान-सहान गोष्टी खटकायला लागतात. मुख्यत: मुलं जेव्हा मोठी असतात, तेव्हा हे जरा जास्तच जाणवतं. लहानपणी नवीन नाती जोडणं जितकं सोपं जातं, तितकं आता ते अवघड वाटतं. त्यामुळे मुलांसाठीही हे नवीन नातं म्हणजे एक चॅलेंज असतं. त्यांच्या मनात आईबाबांबद्दल तऱ्हेतऱ्हेचे विचार यायला लागतात.
- माझे वडील बदललेत. त्यांची बोलण्याची पद्धत, शिस्त, दंगामस्ती करणं, सगळंच बदललंय. त्या नवीन लोकांवर ते जास्त प्रेम करायला लागलेत.
- काय गरज होती हिला लग्न बिग्न करायची? बाबांना ऑलरेडी विसरली की काय ही?
- माझ्या आईला आजकाल वेळच नसतो माझ्यासाठी. आधी मी यायच्या वेळी काहीतरी छान खायला करून माझी वाट बघत असायची, आता मात्र सारखी कामात असते.
- कुठल्यातरी अन-नोन व्यक्तीबरोबर घरात कसं राहायचं? मला नाही सवय अशी.
- माझ्या आईच्या जागी दुस-या कुणालातरी बघायला नाही आवडत मला. त्यापेक्षा आई नसलेली चालेल.
- त्यांनी मला काही शिकवलेलं मला आवडत नाही. मी ठरवीन मला काय करायचं ते. तुम्ही तुमच्या मुलाचं बघा.
- म्हणजे आता माझे खरे आई-बाबा कधीच एकत्र येणार नाहीत. आत्तापर्यंत मला जरा तरी  आशा होती.
- माझ्या वडिलांना काय वाटेल? मला नाही वाटत हे नवीन वडील मला आवडतील असं.

   बहुतेक मुद्दे निगेटिव्ह असतात. तुमच्या वयाची मुलं काहीशी स्वतंत्र झालेली असतात. पण अजून इमोशन्स, रिलेशनशिप्स, दोस्ती, सेक्शुअॅलीटी अशा बाबतीतला त्यांचा स्वत:चा गोंधळ पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नसतो. नव्यानं ठाम मतं बनत असतात आणि ती एकदम टोकाची, तीव्र असतात. आपल्या आधीच्या आई किंवा वडिलांबद्दलची लॉयल्टी कुठलीही नवी नाती स्वीकारू देत नाही. शिवाय या वयात तुमचं सगळं लक्ष एकवटलेलं असतं तुमच्या स्वत:कडे. त्यात इतरांविषयीच्या विचारांना फार जागा नसते. त्यामुळे ‘या सगळ्या परिस्थितीचा मला त्रास होतोय, माझ्या हक्कांवर गदा येतेय’ एवढंच वाटत राहतं. मुलं धुमसत राहतात.
  एक अनोळखी, रँडम व्यक्ती आपली खोली हक्कानं शेअर करतेय, आपल्या घरात राजरोसपणे वावरतेय, आपले नेहमीचे नियम बदलून काहीतरी वेगळेच नियम पाळायला लावतेय, आपल्या वडिलांवर हक्क गाजवतेय हेही तसं जडच जातं स्वीकारायला. मग त्या बाहेरून घरात येणा-या तरुण मुलाला/मुलीला किती ऑकवर्ड, उप-यासारखं वाटत असेल!
     पण जसजसे आपण वेस्टर्न लाईफस्टाईल आपलीशी करतोय, तसतशी या नवीन नात्यांना आणि त्याबरोबर येणा-या कॉम्प्लीकेशन्सना  सामोरं जायची सवय करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. ती नाती कितीही स्ट्रेंज वाटली तरी!

Wednesday, 1 November 2017

न संपणारी गोष्ट


        शौनक पटकन जेवून तयार झाला. रात्री दहा म्हणजे त्याची रोजची यू एसच्या कॉल ची वेळ. ‘अरे एक दिवस तरी वेळेवर झोप! काही दिवसरात्रीचं भान आहे की नाही?’ आईला अजिबात आवडायची नाही ही कामाची विचित्र वेळ. ‘अगं आई,  अमेरिकेत आत्ता कुठे दिवस चालू झालाय. आपण झोपलो म्हणून जग चालायचं थांबत नाही. तुला नाही कळायचं ते.’ पण मग हा तर दिवसभरही ऑफिस मध्ये असतो, तेव्हा काय करतो? याचा दिवस संपतच नाही की काय?

   शौनकच्या दिनक्रमावरून मला एक कथा आठवली. एका राजाला गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. एकदा त्यानं फर्मान काढलं, मला न संपणारी गोष्ट ऐकायचीय. अनेकांनी प्रयत्न केले, पण कधी ना कधी त्यांची गोष्ट संपायची. एका मुलाची गोष्ट तर चांगली तीन महिने चालली, पण शेवटी संपलीच. मग एक साधू आला आणि त्यानं ती सुप्रसिद्ध न संपणारी गोष्ट राजाला सांगितली. तो म्हणाला, ‘एके वर्षी खूप पाऊस झाला, भरपूर धान्य उगवलं. एका शेतकऱ्याने शंभर धान्याची कोठारं भरून ठेवली. काही चिमण्यांनी हे पाहिलं. त्यांनी खूप प्रयत्न करून त्यातल्या एका कोठाराला भोक पाडलं. मग एक चिमणी आली, एक दाणा घेतला, उडून गेली, दुसरी चिमणी आली, एक दाणा घेतला, उडून गेली....’ साधूची गोष्ट अशीच चालू राहिली. राजाला कळून चुकलं, ही गोष्ट जरी न संपणारी असली तरी निरर्थक आहे. म्हणजे न संपणा-या गोष्टी नेहमी चांगल्याच असतात असं नाही. त्यानं साधुबाबांसमोर हार पत्करली.

    ‘टेड टॉक’ नावाचा एक व्याख्यानांचा प्रसिद्ध कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी जो टेड टॉक ऐकला, त्याचा फार इंटरेस्टींग विषय होता, ‘स्टॉपिंग क्यूज’, म्हणजे थांबण्याचे इशारे. ट्वेंटीएथ सेन्चुरीमध्ये प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपायची. तेव्हा सूर्याबरोबर सुरु होणारा दिवस सूर्याबरोबर संपायचा. टीव्हीवरचे कार्यक्रम घड्याळात एक वेळ झाली की संपायचे, आणि तो बंद व्हायचा. अकरा वाजता रेडीओवरचं ‘बेला के फूल’ संपलं की तो बंद करायलाच लागायचा. थोडक्यात, प्रत्येक गोष्टीची आपली एक वेळ असायची आणि आपला एक लाईफ स्पॅन असायचा. आता मात्र त्या न संपणा-या गोष्टीसारखी आपली दिवाळी, सेलिब्रेशन, काम, एन्टरटेनमेंट, हाव, गरजा, टेक्नॉलॉजी,... काही संपतच नाही.  संपत नाही म्हणण्यापेक्षा ते कधी आणि कसं थांबवायचं ते आपल्याला कळत नाही. चोवीस तास रेडीओ चालू असतो, टीव्हीवर ट्वेंटी फोर अवर्स न्यूज चॅनल्स असतात. कुठे सुट्टीला गेलो तरी लोक लॅपटॉपवर काम करत असतात, मोबाईल वर मोठमोठी डील्स करत असतात.

       न संपणारी ही गोष्ट फक्त टेक्नॉलॉजीच्याच बाबतीत होतेय असं नाही. तुमच्यातले किती जण पुस्तक वाचतात? त्यात वेगेवगळे चॅप्टर्स असतात, हो ना? एक चॅप्टर संपला की पुढचा चॅप्टर वाचायचा की नाही हे ठरवायला उसंत मिळते. आणि कधी ना कधी पुस्तक वाचून संपतं. तेच पेपर वाचतानाही होतं. वाचून झालं की घडी करून आपण पेपर बाजूला ठेवून देतो. तीच गोष्ट दिवाळीची. आधी चिवडा, चकलीचा खमंग वास यायला लागला की दिवाळी आली हे आपोआप समजायचं. पण आता? आपली दिवाळी तर कायम चालूच असते. खास दिवाळीशी रिलेटेड ज्या गोष्टी होत्या, फराळ, सुगंधी साबण, नवीन कपडे, त्या आता कायम असतातच आपल्या घरात, नाही का? म्हणजे एखादी गोष्ट ‘आता संपली’ हे लक्षात येण्याचा कोणता मार्गच आपल्यासमोर नसतो आजकाल.

  त्याच टॉक मध्ये यातले काही उपाय सांगितलेले ऐकले. डाईमलर नावाची जर्मन कार कंपनी आहे. तिथे असा नियम आहे की एखादा कुणी जर सुट्टीवर असेल तर त्याला आलेल्या ई मेल्स डिलीट केल्या जातात. म्हणजे तो जेव्हा परत येईल तेव्हा ढीगभर काम त्याच्यासाठी वाट बघत नसतं. तो खरोखरच कामापासून पूर्णपणे डिसकनेक्टेड असतो. स्टीव्ह जॉब्जनं आय पॅड बनवलं, पण त्याच्या घरी ते नव्हतं. त्यानं जाणीवपूर्वक मुलांना त्यापासून दूर ठेवलं होतं.

      वजन जास्त वाढलं किंवा फार खाल्लं तर आपण डी-टॉक्स डाएट करतो ना, तसं मधून मधून टेक्नॉलॉजीचं डी-टॉक्स करायला हवं, तिलाही नाही म्हणायला शिकायला हवं. नाहीतर आपला स्नो बॉल होईल. उतारावरून गडगडत जाताना वाटतं तसं हेल्पलेस वाटायला लागेल. पण ते ‘जुनाट’ स्टॉपिंग क्यूज कुठे आहेत आता? त्यामुळे हा सिग्नल किंवा इशारा तयार करण्याची जबाबदारी पूर्णपणे आपलीच असणार असं दिसतंय. म्हणजे काहीतरी तरकीब शोधायला हवी यावर. मग ते स्वत:नं स्वत:ला घातलेले नियम असतील, एखादी खूण असेल, अलार्म असेल किंवा चक्क मोबाईल कडीकुलुपात ठेवणं असेल.
तुमचा काय आहे स्टॉपिंग क्यू?






  किशोरवय आणि जीवनकौशल्यं डॉ वैशाली देशमुख पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि...