Wednesday, 30 April 2025

आभासी स्पर्श

 (Previously published in Lokmat)

आभासी स्पर्श

डॉ वैशाली देशमुख

नुकत्याच दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एक निकालात आभासी स्पर्श (virtual touch) या संकल्पनेचा उल्लेख आला. अल्पवयीन व्यक्तीवर केल्या गेलेल्या अत्याचाराच्या संदर्भात हा निकाल होता. आरोपीची आणि पीडित व्यक्तीची ओळख ऑनलाइन झाली होती. पालक मुलांना जशी चांगल्या-वाईट स्पर्शाची ओळख करून देतात, तशीच त्यांनी अशा विकृत आभासी स्पर्शाचीही ओळख करून दिली पाहिजे, म्हणजे असे प्रसंग कमी घडतील असं या निकालात म्हटलं होतं.

त्यावर एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेला लेख वाचला. ‘प्राप्तेषु षोडशे वर्षे’ अशा किशोरवयात मुलं स्वत:ची ओळख, स्वत:चं स्थान शोधत असतात. त्यांच्या अंगात रग असते, धोके घेण्याची प्रवृत्ती असते, नवनवीन प्रयोग करून बघण्याची आस असते. त्यांच्या विकासाच्या टप्प्याचा हा एक नैसर्गिक भाग आहे. शिवाय कृतीवर त्यांचा ताबा नसला तरी मुलांना या धोक्यांची जाणीव नसते असं नाही, उलट आभासी जगाच्या संदर्भात त्यांना पालकांपेक्षा काकणभर जास्तच माहिती असते. त्यामुळे इथे प्रशिक्षक म्हणून पालक कमी पडू शकतील असं त्यांना वाटतं.

शिवाय याबाबत कायदे करायचे तर हे वय इतकं परिवर्तनशील असतं, प्रत्येक मुलात इतकं वैविध्य असतं की सर्वांना लागू होतील अशा वयाच्या ठोक मर्यादा तयार करणं फार अवघड आहे. मग करायचं काय? मुलांना या प्रत्यक्ष आणि आभासी जगातल्या धोक्यांपासून बचावायचं कसं? पालकांनी या सगळ्याकडे नुसतं हताशपणे बघत बसायचं का? याविषयी काही मुद्दे पाहूया.

मला वाटतं यात पालक-मुलांपैकी कुणाचं ज्ञान किती, कोण कशात जास्त हुशार हे बाजूला ठेवू. अगदी लहानपणी पालक मुलांपेक्षा सर्वच बाबतीत ज्ञानानं, अनुभवानं, विचारांनी वरचढ असतात. नंतर हळूहळू मुलांचं स्वत:चं व्यक्तीमत्त्व विकसित होत जातं. ते आपापली स्वतंत्र विचारसरणी, मूल्यसंस्था बनवतात. बहुतेक वेळा पालक स्वत:ला मिळालेल्या संधींपेक्षा अधिक संधी मुलांना मिळतील हे बघतात, त्यामुळे साहजिकच मुलांचं सामान्यज्ञान आणि प्रत्यक्षदर्शी अनुभव पालकांपेक्षा अधिक असणं साहजिक आहे. किशोरवयाची वैशिष्ट्यं बघता मुलं धोके घेणार, मर्यादा धुडकावून देऊन नवनवीन प्रयोग करणार हे गृहीत आहे. त्यांच्या स्व-ओळखीच्या शोधाच्या प्रवासाची ती गरजही आहे. प्रौढांना जो प्रत्यक्ष किंवा आभासी स्पर्श वाईट वाटतो तो त्यांना शृंगारिक, हवाहवासाही वाटू शकेल. पण त्याचबरोबर त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या मर्यादा पाहता निर्णय घेण्यात, कृतींचे परिणाम समजण्यात त्यांना अडचणी येणार हेही सत्य आहे. याउलट प्रत्यक्ष तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली तांत्रिक माहिती कमी असली तरी सारासार विचार, परिणामांची रास्त जाणीव आणि मुलांचं भलं व्हावं अशी तीव्र आंतरिक इच्छा ही पालकांची ताकद आहे. आभासी जगाचं सामर्थ्य खूप आहे. त्यावर ताबा मिळवणं सोपं नाही हे लक्षात आलंय. पण भस्मासुर निर्माण झाला तेव्हाही असंच वाटलं होतं. इतकं पौराणिक उदाहरण कशाला, तीन-चार वर्षांपूर्वी आलेल्या, अशक्य वाटलेल्या कोव्हिडच्या त्सुनामीतूनही जग सावरलं, हळूहळू स्थिरस्थावर झालं. आभासी जगाच्या आपरिहार्यतेचा आपल्याला स्वीकार करावा लागणार आहे, त्याचबरोबर त्याला ताब्यात जरी ठेवता आलं नाही तरी निदान अनिर्बंध राज्य तरी करू देता येणार नाही असं बघायला हवं.

पण स्वत: परिपूर्ण ज्ञान मिळवल्यानंतरच पालक मुलांना विवेकी वर्तन शिकवू शकतील असं ठरवलं तर ते फार अवास्तव होईल. आयुष्य इतकं अनपेक्षितपणे उलगडतं की पुढे येणाऱ्या प्रत्येक घटिताबद्दल पालकांना, मुलांना यथोचित माहिती असणं अशक्य आहे. आभासी धोक्यांबद्दलही तेच खरं आहे. त्याविषयी अगदी संपूर्ण माहिती ना पालकांना असते ना मुलांना. त्यामुळे ‘हे असं झालं तर असं वाग, तसं झालं तर याचा उपयोग होईल’ अशी ठाम मार्गदर्शक तत्त्वं घालून देता येणार नाहीच आहेत. पण शेवटी मिळालेल्या कोणत्याही ज्ञानाला सुरक्षितपणे हाताळायचं कसं याचे सर्वसाधारण नियम असतातच की! कुठलीही समस्या आली, द्विधा अवस्था झाली तर कसा विचार करायचा; स्वत:ला कसा वेळ द्यायचा; त्यातल्या त्यात योग्य निर्णय कसा घ्यायचा; आणि तरीही समस्या आलीच तर त्यातून बाहेर कसं पडायचं हे तरी निश्चित सांगता येईल. दिवसभरात घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगातून या पद्धतींचं प्रात्यक्षिक देता येईल. हीच कौशल्यं मुलांना नाती बनवायला, वाढवायला आणि जपायला शिकवतात; ताणतणावांना आणि आपत्तींना तोंड द्यायला तयार करतात. माध्यमं हाताळताना वापरायचा सारासार विवेक शिकवतात. मित्रांच्या दबावाला तोंड द्यायला सक्षम करतात. आपण स्वतंत्र असलो तरी एकटे नाही आहोत, समाजाचा एक भाग आहोत, त्याप्रती माझी काही कर्तव्यं आहेत याची जाणीव करून देतात. भविष्यातल्या अनोळखी, अगम्य आयुष्यात वाटचाल करताना अदृश्य दिशादर्शकाचं काम करतात.

एकूण विचार करता असं ध्यानात येतं की न्यायालयानं उल्लेख केलेली ही आभासी स्पर्शाची संकल्पना खूप महत्त्वाची आहे. पण आभासी स्पर्श म्हणजे नक्की काय याची व्याख्या कशी करायची? जी आभासी वर्तणूक आपल्या आयुष्याला, लैंगिकतेला नकारात्मकरित्या स्पर्श करते, उद्दीपीत करते त्या गोष्टींचा यात समावेश करता येईल का? काही उदाहरणं सांगायची झाली तर – अश्लील व्हिडिओजची, फोटोंची किंवा मेसेजेसची देवाणघेवाण, अनोळखी व्यक्तींशी व्यक्तिगत माहिती शेअर करणे, तुंटपुंज्या माहितीच्या आधारे अशा व्यक्तींना प्रत्यक्ष भेटायला जाणे, शहानिशा न करता फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवून त्यांना पासवर्ड सांगणे, .. ही यादी अर्थातच न संपणारी आणि सतत बदलत राहणारी आहे, त्यामुळे ती कधीच फायनल किंवा परिपूर्ण नसणार. पण साधारणपणे अशा प्रकारची परिस्थिति आली किंवा त्याबद्दल नकोशी भावना मनात आली तर निदान निर्णय घेण्याआधी थोडा वेळ द्यावा, जपून पावलं टाकावीत, ती तीव्र उर्मी काही वेळासाठी तरी ताब्यात ठेवावी, आणि जरूर पडल्यास मदत घ्यावी याविषयीचं प्रशिक्षण पालकांना मुलांना देता येईल. फक्त ‘आम्हाला सगळं समजतं’ अशा आवेशात नको, तशी ती ऐकणार नाहीत, किशोरवयात तर नाहीच. कदाचित गटांमध्ये ते प्रात्यक्षिकासाहित, मुलांना सहभागी करून घेत जास्त उपयुक्तपणे पोचवता येईल. तिथे दुतर्फा चर्चा होईल, मुलांना त्यांची मतं व्यक्त करण्याची संधीही मिळेल, ज्यामुळे आपल्याला वर्तणुकीतल्या बदलांची जी अपेक्षा आहे तीही पुरी होण्याची शक्यता वाढेल. कारण वाढत्या वयाच्या मुलांना त्यांच्याविषयी निर्णय घेताना त्या प्रक्रियेत सामील करून घेतलं जाण्याची अपेक्षा असते, तरच नियम आणि कायदे पाळले जातात. किशोरवयात असणाऱ्या दोस्तांच्या प्रभावाचा विचार करता यात मित्र-प्रशिक्षक (peer educators) या संकल्पनेचा वापर उपयुक्त ठरेल, म्हणजे काही किशोरवयीन मुलांना याबाबत प्रशिक्षित करून इतरांना त्यांनी त्याबद्दल माहिती सांगायची, मदत करायची.

आभासी स्पर्शाच्या या संकल्पनेवर अजून प्रवाही विचार करत राहू या, कदाचित अजून खूप काही गवसेल यातून.


No comments:

Post a Comment

  किशोरवय आणि जीवनकौशल्यं डॉ वैशाली देशमुख पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि...