Tuesday, 24 June 2025

 

किशोरवय आणि जीवनकौशल्यं

डॉ वैशाली देशमुख

पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ

समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि त्यासाठी शून्यातून सुरुवात करायची आहे. तर काय काय करायला लागेल? सर्वप्रथम त्यासाठी लागणाऱ्या घटक पदार्थांची यादी करायला लागेल. मग भांडी वगैरे इतर काय काय साहित्य लागणार, ते घरात आहे का हे पाहायला लागेल. किती लोकांसाठी करायची आहे हे बघून तितके टोमॅटो आणि कांदे आणायला लागतील. तयार करायला किती वेळ लागेल याचा अंदाज घ्यायला लागेल. आपल्या बाकीच्या कामातून कधी करता येईल आणि खाण्याच्या किती वेळ आधी ती बनवायची आहे हे पाहून ती वेळ ठरवायला लागेल. मग कांद्याचे आणि टोमॅटोचे योग्य आकारात तुकडे करायला लागतील, फार मोठे नाहीत, फार लहान नाहीत. कोथिंबीर चिरायला लागेल. शेंगदाणे आणून ते भाजून त्याचं कूट करायला लागेल. मग त्यात किती साखर, मीठ घालायचं याचा अंदाज घेऊन ते घालायला लागेल. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून, हव्या त्या भांड्यात काढून ठेवायचं, त्यावर झाकण ठेवायचं. कचरा गोळा करून ओल्या कचऱ्यात टाकायचा. ओटा स्वच्छ करायचा. चव घेऊन बघायची. खाताना कुणी त्याला नावं ठेवतील, कुणी नावाजतील. नंतर उरलेली कोशिंबीर काढून फ्रीजमधे ठेवायची.  

आता सवयीनं तुम्ही कदाचित या सगळ्या पायऱ्या सहजपणे, विचार न करता पटापट करत असाल. हेच काम जर तुम्ही एखाद्या नवख्याला सांगितलं, तर काय होईल? ऐनवेळी ‘हे कुठेय, ते नाहीये घरात’ वगैरे धावपळ, आरडाओरडा, चिडचिड, जेवायची वेळ झाली तरी पदार्थ तयार नसणं, प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी झालेली कोशिंबीर, मीठ कमी-जास्त, पदार्थ बिघडणं, नंतर पसारा तसाच, कुणी नावं ठेवली तर हिरमुसणं, कचऱ्याचं वर्गीकरण न करणं, उरलेली कोशिंबीर तशीच राहून दुसऱ्या दिवशी खराब होणं – यातल्या एक किंवा अनेक गोष्टी घडतील.

याचं कारण असं की कोशिंबिरीसारखी अगदी साधी गोष्ट करायची झाली तरी त्यासाठी पाककौशल्य तर लागतंच पण वेळेच्या नियोजनापासून ते प्रमाणाचा अंदाज घेण्यापर्यंत; भावना हाताळण्यापासून ते दूरगामी विचार करण्यापर्यंत, इतरही कितीतरी कसब लागतं. मग गुंतागुंतीच्या गोष्टींसाठी तर किती काय काय लागत असेल! आपल्या दैनंदिन कामांच्या पूर्ततेसाठी, त्यांच्या नियोजनासाठी, त्याबरोबर येणाऱ्या भावनांच्या हाताळणीसाठी ही जी कौशल्यं लागतात ती शाळेच्या कुठल्या अभ्यासक्रमात शिकवत नाहीत. ही जीवनकौशल्यं किशोरवयात फार महत्त्वाची असल्याचं आढळून आलंय. आणि त्याला कारण आहे त्यांचं धेडगुजरी, अपरिपक्व वय; लवचिक, संस्कारक्षम मेंदू; आणि त्यांच्यासमोर उभी ठाकणारी अभूतपूर्व आव्हानं!  

भारतात १० ते १९ या वयातल्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के (२५३ दशलक्ष) इतकी प्रचंड आहे. इतर विकसनशील आणि अविकसित देशांतही हा वयोगट मोठ्या संख्येनं आहे. विकसित देशांत त्यांची संख्या त्यामानानं कमी असली तरी असंख्य प्रश्न आहेतच. जगात सगळीकडे आता किशोरवयीन मुलांविषयी, त्यांच्या समस्यांविषयी जागृती झालीये. मानवजातीचं भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे, याची जाणीव झालीय. घरात, घराबाहेर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यायला लागतं. त्यांच्या अंगात आणि मेंदूत भरपूर शक्ति असते. पण मेंदू अजून कच्चं मडकं असल्यामुळे सारासार, विवेकी विचार करणं त्यांना अवघड जातं. त्यांची विचार करण्याची पद्धत आवेगी आणि बेपर्वा असते. परिणामांचा विचार करण्याची कुवत नसते, तरीही प्रयोग मात्र करून पहावेसे वाटतात. दोस्तांचा आणि माध्यमांचा प्रचंड प्रभाव असतो. आयुष्य घडवणाऱ्या किंवा बिघडवणाऱ्या अनेक निर्णयांचा काटेरी रस्ता समोर लांबच लांब पसरलेला असतो. शिवाय आपण सगळे जाणतो की आजचं जग कितीतरी अधिक हिंसक, लैंगिक, चिथावणीखोर आणि बटबटीत आहे. त्यावर तंत्रज्ञान आणि माध्यमं यांचा मजबूत पगडा आहे. ही अंतर्गत आणि बाह्य लढाई फक्त पालकांसाठीच नव्हे तर मुलांसाठी सुद्धा अवघड असते.  

विसाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी किशोरांच्या स्वास्थ्याविषयी जागरूक असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेसारख्या अनेक संघटनांनी यावर काहीतरी करायचं ठरवलं. त्याला कारणीभूत होतं जगभरात किशोरांवर झालेलं संशोधन. त्यांच्यामधला वाढता हिंसाचार, लैंगिक प्रयोग आणि गुंतगुंती, व्यसनं, शैक्षणिक समस्या आणि मानसिक अस्वास्थ्य यांची आकडेवारी भयावह आहे. या सगळ्याला मुलांचाही नाईलाज आहे. त्यांनी नाही तयार केलेली ही परिस्थिति. त्यामुळे फक्त दोषारोप करत बसण्यात अर्थ नाही. अनुभव नसल्यामुळे त्यातल्या कित्येक समस्यांना ते पहिल्यांदाच सामोरे जातात. भविष्यात घडू शकणाऱ्या प्रत्येक समस्येविषयी त्यांना सांगणं, त्यावर तोडगा काढणं कसं शक्य आहे? पालकांचे नुसते सल्ले तर मुलांना नकोच असतात. मग असं काय करता येईल की ज्याचा वापर विभिन्न प्रसंगांत करता येईल? अशी काही मूलभूत कौशल्यं आहेत का, जी मुलांना या आव्हानांविरुद्ध सक्षम करण्यासाठी वापरता येतील? यावर बरंच विचारमंथन झालं. त्यातून या वयातल्या मुलांसाठी आवश्यक अशी दहा जीवनकौशल्यांची यादी तयार झाली. त्यांची नावं अशी-

स्वओळख, सहसंवेदना, समस्या-निवारण, निर्णयक्षमता, सर्जक विचार, सारासार-चिकित्सक विचार, भावनांची योग्य हाताळणी, ताणतणावांचा सामना, परस्पर-नातेसंबंध आणि संवादकौशल्य  

यातली काही कौशल्यं मुलांमध्ये आपपत: असतात. इतर काही सरावानं आत्मसात करता येतात. आपल्याला कल्पना येणार नाही इतक्या वेळा आपण त्यांचा दैनंदिन जीवनात नकळतपणे वापर करत असतो. मगाच्या कोशिंबीरीच्या उदाहरणात आपण त्याची चुणूक पाहिली. जसं एकच कसब अनेक प्रसंगांमद्धे उपयुक्त ठरतं तसंच एका प्रसंगामध्ये अनेक कौशल्यांचा एकत्रित उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ आपलं म्हणणं मित्रांना पटवून द्यायला संवादाचं कसब लागतं, तसंच ते नोकरीसाठी मुलाखत देताना किंवा वाट चुकल्यावर पत्ता विचारतानाही लागतं. परीक्षेची तयारी करताना अनेक जीवनकौशल्यांचा एकत्रित वापर करायला लागतो- आपली कुवत काय, कुठपर्यंत झेप घ्यायची आहे, त्यासाठी कसंकसं नियोजन करायला लागेल, तणावाला काबूत कसं ठेवायचं, अभ्यासाची कुठली तंत्रं वापरायची, पुस्तकातले कुठले भाग गाळता येतील, घरातल्यांचं सहकार्य कसं मिळवायचं आणि जो काही निकाल लागेल त्याला कसं तोंड द्यायचं!

‘नाही’ म्हणायचं संवादकौशल्य घेऊ. कुठे कुठे आवश्यक असतं ते मुलांना? दोस्तांच्या दबावाला बळी पडू नये यासाठी, प्रेमाच्या नकोशा आविष्काराला थोपवण्यासाठी, व्यसनांच्या अधीन होऊ नये म्हणून, असुरक्षित लैंगिक संबंध टाळण्यासाठी,.. यातली बहुतेक आव्हानं किशोरवयीन मुलांना येतात तेव्हा आईबाबा आसपास नसतात. त्यांच्यावर पटकन निर्णय घेण्याचा दबाव असतो. पण दूरगामी विचार करण्याची शक्ति विकसित झालेली नसते आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व स्थापित करण्याची निकड तर भासत असते. नंतर पालकांच्या होणाऱ्या दोषारोपांपेक्षा ताबडतोब मिळणारी दोस्तांची मान्यता वरचढ ठरते. त्या आणीबाणीच्या प्रसंगात या सगळ्या भावनिक कल्लोळाला तोंड देऊन निर्णयापर्यंत पोचणं त्यांच्या अपरिपक्व मेंदूला झेपणं अवघडच असतं. म्हणूनच या अधोरेखित केलेल्या जीवनकौशल्यांनी त्यांना सक्षम करायला हवं.   

टीनएज प्रेग्नन्सी, हिंसाचार, व्यसनं, सामाजिक कौशल्यांचा अभाव, माध्यमांचा अतिरेक आणि बिघडलेलं मन:स्वास्थ्य अशा असंख्य अडचणींशी आजची पिढी झगडतेय. पेपरमध्ये मन सुन्न करणाऱ्या बातम्या वाचल्या की दरवेळी भीतीची आणि रागाची लहर अंगात उठते. पालक म्हणून आपण कुठेकुठे पुरे पडणार, अशी असहाय्यतेची भावना मनात येते. आपल्या मुलांच्या वर्तमान आणि भविष्याविषयी काळजी वाटायला लागते. समाज म्हणून याचा एकत्रित सामना करणं आवश्यक आहेच, आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. पण बाह्य जगाला बाधित केलेल्या या विषावर वैयक्तिक पातळीवर जीवनकौशल्यं शिकवून उतारा शोधता येईल का? सुदैवानं आत्तापर्यंत झालेलं संशोधन याला दुजोरा देतंय.

आणि हो, किशोरवयीन मुलांच्या पालकांना स्वत:साठी यांचा उपयोग आहेच की! आयुष्याच्या मध्यावर पोचल्यावर त्यांनाही काही कमी आव्हानं नसतात. भावनिक उद्रेकांपासून स्वत:ला वाचवायची त्यांनाही गरज असते. नात्यांच्या गुंता सोडवायचा असतो. आर्थिक, शारीरिक अडचणींना तोंड द्यायचं असतं. एक बरंय की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर जीवनकौशल्यं शिकता येतात. ती कशी शिकायची आणि शिकवायची हा एक खूप मोठा आणि स्वतंत्र विषय आहे. त्याविषयी पुनः केव्हातरी.   

 

Wednesday, 30 April 2025

आभासी स्पर्श

 (Previously published in Lokmat)

आभासी स्पर्श

डॉ वैशाली देशमुख

नुकत्याच दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एक निकालात आभासी स्पर्श (virtual touch) या संकल्पनेचा उल्लेख आला. अल्पवयीन व्यक्तीवर केल्या गेलेल्या अत्याचाराच्या संदर्भात हा निकाल होता. आरोपीची आणि पीडित व्यक्तीची ओळख ऑनलाइन झाली होती. पालक मुलांना जशी चांगल्या-वाईट स्पर्शाची ओळख करून देतात, तशीच त्यांनी अशा विकृत आभासी स्पर्शाचीही ओळख करून दिली पाहिजे, म्हणजे असे प्रसंग कमी घडतील असं या निकालात म्हटलं होतं.

त्यावर एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेला लेख वाचला. ‘प्राप्तेषु षोडशे वर्षे’ अशा किशोरवयात मुलं स्वत:ची ओळख, स्वत:चं स्थान शोधत असतात. त्यांच्या अंगात रग असते, धोके घेण्याची प्रवृत्ती असते, नवनवीन प्रयोग करून बघण्याची आस असते. त्यांच्या विकासाच्या टप्प्याचा हा एक नैसर्गिक भाग आहे. शिवाय कृतीवर त्यांचा ताबा नसला तरी मुलांना या धोक्यांची जाणीव नसते असं नाही, उलट आभासी जगाच्या संदर्भात त्यांना पालकांपेक्षा काकणभर जास्तच माहिती असते. त्यामुळे इथे प्रशिक्षक म्हणून पालक कमी पडू शकतील असं त्यांना वाटतं.

शिवाय याबाबत कायदे करायचे तर हे वय इतकं परिवर्तनशील असतं, प्रत्येक मुलात इतकं वैविध्य असतं की सर्वांना लागू होतील अशा वयाच्या ठोक मर्यादा तयार करणं फार अवघड आहे. मग करायचं काय? मुलांना या प्रत्यक्ष आणि आभासी जगातल्या धोक्यांपासून बचावायचं कसं? पालकांनी या सगळ्याकडे नुसतं हताशपणे बघत बसायचं का? याविषयी काही मुद्दे पाहूया.

मला वाटतं यात पालक-मुलांपैकी कुणाचं ज्ञान किती, कोण कशात जास्त हुशार हे बाजूला ठेवू. अगदी लहानपणी पालक मुलांपेक्षा सर्वच बाबतीत ज्ञानानं, अनुभवानं, विचारांनी वरचढ असतात. नंतर हळूहळू मुलांचं स्वत:चं व्यक्तीमत्त्व विकसित होत जातं. ते आपापली स्वतंत्र विचारसरणी, मूल्यसंस्था बनवतात. बहुतेक वेळा पालक स्वत:ला मिळालेल्या संधींपेक्षा अधिक संधी मुलांना मिळतील हे बघतात, त्यामुळे साहजिकच मुलांचं सामान्यज्ञान आणि प्रत्यक्षदर्शी अनुभव पालकांपेक्षा अधिक असणं साहजिक आहे. किशोरवयाची वैशिष्ट्यं बघता मुलं धोके घेणार, मर्यादा धुडकावून देऊन नवनवीन प्रयोग करणार हे गृहीत आहे. त्यांच्या स्व-ओळखीच्या शोधाच्या प्रवासाची ती गरजही आहे. प्रौढांना जो प्रत्यक्ष किंवा आभासी स्पर्श वाईट वाटतो तो त्यांना शृंगारिक, हवाहवासाही वाटू शकेल. पण त्याचबरोबर त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या मर्यादा पाहता निर्णय घेण्यात, कृतींचे परिणाम समजण्यात त्यांना अडचणी येणार हेही सत्य आहे. याउलट प्रत्यक्ष तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली तांत्रिक माहिती कमी असली तरी सारासार विचार, परिणामांची रास्त जाणीव आणि मुलांचं भलं व्हावं अशी तीव्र आंतरिक इच्छा ही पालकांची ताकद आहे. आभासी जगाचं सामर्थ्य खूप आहे. त्यावर ताबा मिळवणं सोपं नाही हे लक्षात आलंय. पण भस्मासुर निर्माण झाला तेव्हाही असंच वाटलं होतं. इतकं पौराणिक उदाहरण कशाला, तीन-चार वर्षांपूर्वी आलेल्या, अशक्य वाटलेल्या कोव्हिडच्या त्सुनामीतूनही जग सावरलं, हळूहळू स्थिरस्थावर झालं. आभासी जगाच्या आपरिहार्यतेचा आपल्याला स्वीकार करावा लागणार आहे, त्याचबरोबर त्याला ताब्यात जरी ठेवता आलं नाही तरी निदान अनिर्बंध राज्य तरी करू देता येणार नाही असं बघायला हवं.

पण स्वत: परिपूर्ण ज्ञान मिळवल्यानंतरच पालक मुलांना विवेकी वर्तन शिकवू शकतील असं ठरवलं तर ते फार अवास्तव होईल. आयुष्य इतकं अनपेक्षितपणे उलगडतं की पुढे येणाऱ्या प्रत्येक घटिताबद्दल पालकांना, मुलांना यथोचित माहिती असणं अशक्य आहे. आभासी धोक्यांबद्दलही तेच खरं आहे. त्याविषयी अगदी संपूर्ण माहिती ना पालकांना असते ना मुलांना. त्यामुळे ‘हे असं झालं तर असं वाग, तसं झालं तर याचा उपयोग होईल’ अशी ठाम मार्गदर्शक तत्त्वं घालून देता येणार नाहीच आहेत. पण शेवटी मिळालेल्या कोणत्याही ज्ञानाला सुरक्षितपणे हाताळायचं कसं याचे सर्वसाधारण नियम असतातच की! कुठलीही समस्या आली, द्विधा अवस्था झाली तर कसा विचार करायचा; स्वत:ला कसा वेळ द्यायचा; त्यातल्या त्यात योग्य निर्णय कसा घ्यायचा; आणि तरीही समस्या आलीच तर त्यातून बाहेर कसं पडायचं हे तरी निश्चित सांगता येईल. दिवसभरात घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगातून या पद्धतींचं प्रात्यक्षिक देता येईल. हीच कौशल्यं मुलांना नाती बनवायला, वाढवायला आणि जपायला शिकवतात; ताणतणावांना आणि आपत्तींना तोंड द्यायला तयार करतात. माध्यमं हाताळताना वापरायचा सारासार विवेक शिकवतात. मित्रांच्या दबावाला तोंड द्यायला सक्षम करतात. आपण स्वतंत्र असलो तरी एकटे नाही आहोत, समाजाचा एक भाग आहोत, त्याप्रती माझी काही कर्तव्यं आहेत याची जाणीव करून देतात. भविष्यातल्या अनोळखी, अगम्य आयुष्यात वाटचाल करताना अदृश्य दिशादर्शकाचं काम करतात.

एकूण विचार करता असं ध्यानात येतं की न्यायालयानं उल्लेख केलेली ही आभासी स्पर्शाची संकल्पना खूप महत्त्वाची आहे. पण आभासी स्पर्श म्हणजे नक्की काय याची व्याख्या कशी करायची? जी आभासी वर्तणूक आपल्या आयुष्याला, लैंगिकतेला नकारात्मकरित्या स्पर्श करते, उद्दीपीत करते त्या गोष्टींचा यात समावेश करता येईल का? काही उदाहरणं सांगायची झाली तर – अश्लील व्हिडिओजची, फोटोंची किंवा मेसेजेसची देवाणघेवाण, अनोळखी व्यक्तींशी व्यक्तिगत माहिती शेअर करणे, तुंटपुंज्या माहितीच्या आधारे अशा व्यक्तींना प्रत्यक्ष भेटायला जाणे, शहानिशा न करता फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवून त्यांना पासवर्ड सांगणे, .. ही यादी अर्थातच न संपणारी आणि सतत बदलत राहणारी आहे, त्यामुळे ती कधीच फायनल किंवा परिपूर्ण नसणार. पण साधारणपणे अशा प्रकारची परिस्थिति आली किंवा त्याबद्दल नकोशी भावना मनात आली तर निदान निर्णय घेण्याआधी थोडा वेळ द्यावा, जपून पावलं टाकावीत, ती तीव्र उर्मी काही वेळासाठी तरी ताब्यात ठेवावी, आणि जरूर पडल्यास मदत घ्यावी याविषयीचं प्रशिक्षण पालकांना मुलांना देता येईल. फक्त ‘आम्हाला सगळं समजतं’ अशा आवेशात नको, तशी ती ऐकणार नाहीत, किशोरवयात तर नाहीच. कदाचित गटांमध्ये ते प्रात्यक्षिकासाहित, मुलांना सहभागी करून घेत जास्त उपयुक्तपणे पोचवता येईल. तिथे दुतर्फा चर्चा होईल, मुलांना त्यांची मतं व्यक्त करण्याची संधीही मिळेल, ज्यामुळे आपल्याला वर्तणुकीतल्या बदलांची जी अपेक्षा आहे तीही पुरी होण्याची शक्यता वाढेल. कारण वाढत्या वयाच्या मुलांना त्यांच्याविषयी निर्णय घेताना त्या प्रक्रियेत सामील करून घेतलं जाण्याची अपेक्षा असते, तरच नियम आणि कायदे पाळले जातात. किशोरवयात असणाऱ्या दोस्तांच्या प्रभावाचा विचार करता यात मित्र-प्रशिक्षक (peer educators) या संकल्पनेचा वापर उपयुक्त ठरेल, म्हणजे काही किशोरवयीन मुलांना याबाबत प्रशिक्षित करून इतरांना त्यांनी त्याबद्दल माहिती सांगायची, मदत करायची.

आभासी स्पर्शाच्या या संकल्पनेवर अजून प्रवाही विचार करत राहू या, कदाचित अजून खूप काही गवसेल यातून.


Friday, 19 July 2024

English book on Teenage parenting 'Help! Teenager at Home'


Available on www.rajhansprakashan.com, Amazon 



 

Teenage parenting session @ Bhavartha






 Had an amazing,  interactive session on teenage parenting at Bhavartha Books on 18th July 2024

To watch, click on

https://thesocialreform-my.sharepoint.com/:v:/g/personal/prerana_thesocialreforms_org/EZLUFrPx5fNJnmF95dT8WcIBkZncGwCgscpuPDB3P_8q0Q?e=PhJo2J


Sunday, 29 October 2023

One dish meal: Thalipeeth


 A high protein, versatile, filling snack which can be a one dish meal in itself, thalipeeth is a unique staple of Maharashtra.

The flour can be home made using a mixture of roasted cereals and pulses. It is also available ready-made. 

A variety of different veggies can be added to make it more flavourful and nutritious. 

  किशोरवय आणि जीवनकौशल्यं डॉ वैशाली देशमुख पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि...