Tuesday, 24 June 2025

 

किशोरवय आणि जीवनकौशल्यं

डॉ वैशाली देशमुख

पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ

समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि त्यासाठी शून्यातून सुरुवात करायची आहे. तर काय काय करायला लागेल? सर्वप्रथम त्यासाठी लागणाऱ्या घटक पदार्थांची यादी करायला लागेल. मग भांडी वगैरे इतर काय काय साहित्य लागणार, ते घरात आहे का हे पाहायला लागेल. किती लोकांसाठी करायची आहे हे बघून तितके टोमॅटो आणि कांदे आणायला लागतील. तयार करायला किती वेळ लागेल याचा अंदाज घ्यायला लागेल. आपल्या बाकीच्या कामातून कधी करता येईल आणि खाण्याच्या किती वेळ आधी ती बनवायची आहे हे पाहून ती वेळ ठरवायला लागेल. मग कांद्याचे आणि टोमॅटोचे योग्य आकारात तुकडे करायला लागतील, फार मोठे नाहीत, फार लहान नाहीत. कोथिंबीर चिरायला लागेल. शेंगदाणे आणून ते भाजून त्याचं कूट करायला लागेल. मग त्यात किती साखर, मीठ घालायचं याचा अंदाज घेऊन ते घालायला लागेल. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून, हव्या त्या भांड्यात काढून ठेवायचं, त्यावर झाकण ठेवायचं. कचरा गोळा करून ओल्या कचऱ्यात टाकायचा. ओटा स्वच्छ करायचा. चव घेऊन बघायची. खाताना कुणी त्याला नावं ठेवतील, कुणी नावाजतील. नंतर उरलेली कोशिंबीर काढून फ्रीजमधे ठेवायची.  

आता सवयीनं तुम्ही कदाचित या सगळ्या पायऱ्या सहजपणे, विचार न करता पटापट करत असाल. हेच काम जर तुम्ही एखाद्या नवख्याला सांगितलं, तर काय होईल? ऐनवेळी ‘हे कुठेय, ते नाहीये घरात’ वगैरे धावपळ, आरडाओरडा, चिडचिड, जेवायची वेळ झाली तरी पदार्थ तयार नसणं, प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी झालेली कोशिंबीर, मीठ कमी-जास्त, पदार्थ बिघडणं, नंतर पसारा तसाच, कुणी नावं ठेवली तर हिरमुसणं, कचऱ्याचं वर्गीकरण न करणं, उरलेली कोशिंबीर तशीच राहून दुसऱ्या दिवशी खराब होणं – यातल्या एक किंवा अनेक गोष्टी घडतील.

याचं कारण असं की कोशिंबिरीसारखी अगदी साधी गोष्ट करायची झाली तरी त्यासाठी पाककौशल्य तर लागतंच पण वेळेच्या नियोजनापासून ते प्रमाणाचा अंदाज घेण्यापर्यंत; भावना हाताळण्यापासून ते दूरगामी विचार करण्यापर्यंत, इतरही कितीतरी कसब लागतं. मग गुंतागुंतीच्या गोष्टींसाठी तर किती काय काय लागत असेल! आपल्या दैनंदिन कामांच्या पूर्ततेसाठी, त्यांच्या नियोजनासाठी, त्याबरोबर येणाऱ्या भावनांच्या हाताळणीसाठी ही जी कौशल्यं लागतात ती शाळेच्या कुठल्या अभ्यासक्रमात शिकवत नाहीत. ही जीवनकौशल्यं किशोरवयात फार महत्त्वाची असल्याचं आढळून आलंय. आणि त्याला कारण आहे त्यांचं धेडगुजरी, अपरिपक्व वय; लवचिक, संस्कारक्षम मेंदू; आणि त्यांच्यासमोर उभी ठाकणारी अभूतपूर्व आव्हानं!  

भारतात १० ते १९ या वयातल्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के (२५३ दशलक्ष) इतकी प्रचंड आहे. इतर विकसनशील आणि अविकसित देशांतही हा वयोगट मोठ्या संख्येनं आहे. विकसित देशांत त्यांची संख्या त्यामानानं कमी असली तरी असंख्य प्रश्न आहेतच. जगात सगळीकडे आता किशोरवयीन मुलांविषयी, त्यांच्या समस्यांविषयी जागृती झालीये. मानवजातीचं भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे, याची जाणीव झालीय. घरात, घराबाहेर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यायला लागतं. त्यांच्या अंगात आणि मेंदूत भरपूर शक्ति असते. पण मेंदू अजून कच्चं मडकं असल्यामुळे सारासार, विवेकी विचार करणं त्यांना अवघड जातं. त्यांची विचार करण्याची पद्धत आवेगी आणि बेपर्वा असते. परिणामांचा विचार करण्याची कुवत नसते, तरीही प्रयोग मात्र करून पहावेसे वाटतात. दोस्तांचा आणि माध्यमांचा प्रचंड प्रभाव असतो. आयुष्य घडवणाऱ्या किंवा बिघडवणाऱ्या अनेक निर्णयांचा काटेरी रस्ता समोर लांबच लांब पसरलेला असतो. शिवाय आपण सगळे जाणतो की आजचं जग कितीतरी अधिक हिंसक, लैंगिक, चिथावणीखोर आणि बटबटीत आहे. त्यावर तंत्रज्ञान आणि माध्यमं यांचा मजबूत पगडा आहे. ही अंतर्गत आणि बाह्य लढाई फक्त पालकांसाठीच नव्हे तर मुलांसाठी सुद्धा अवघड असते.  

विसाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी किशोरांच्या स्वास्थ्याविषयी जागरूक असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेसारख्या अनेक संघटनांनी यावर काहीतरी करायचं ठरवलं. त्याला कारणीभूत होतं जगभरात किशोरांवर झालेलं संशोधन. त्यांच्यामधला वाढता हिंसाचार, लैंगिक प्रयोग आणि गुंतगुंती, व्यसनं, शैक्षणिक समस्या आणि मानसिक अस्वास्थ्य यांची आकडेवारी भयावह आहे. या सगळ्याला मुलांचाही नाईलाज आहे. त्यांनी नाही तयार केलेली ही परिस्थिति. त्यामुळे फक्त दोषारोप करत बसण्यात अर्थ नाही. अनुभव नसल्यामुळे त्यातल्या कित्येक समस्यांना ते पहिल्यांदाच सामोरे जातात. भविष्यात घडू शकणाऱ्या प्रत्येक समस्येविषयी त्यांना सांगणं, त्यावर तोडगा काढणं कसं शक्य आहे? पालकांचे नुसते सल्ले तर मुलांना नकोच असतात. मग असं काय करता येईल की ज्याचा वापर विभिन्न प्रसंगांत करता येईल? अशी काही मूलभूत कौशल्यं आहेत का, जी मुलांना या आव्हानांविरुद्ध सक्षम करण्यासाठी वापरता येतील? यावर बरंच विचारमंथन झालं. त्यातून या वयातल्या मुलांसाठी आवश्यक अशी दहा जीवनकौशल्यांची यादी तयार झाली. त्यांची नावं अशी-

स्वओळख, सहसंवेदना, समस्या-निवारण, निर्णयक्षमता, सर्जक विचार, सारासार-चिकित्सक विचार, भावनांची योग्य हाताळणी, ताणतणावांचा सामना, परस्पर-नातेसंबंध आणि संवादकौशल्य  

यातली काही कौशल्यं मुलांमध्ये आपपत: असतात. इतर काही सरावानं आत्मसात करता येतात. आपल्याला कल्पना येणार नाही इतक्या वेळा आपण त्यांचा दैनंदिन जीवनात नकळतपणे वापर करत असतो. मगाच्या कोशिंबीरीच्या उदाहरणात आपण त्याची चुणूक पाहिली. जसं एकच कसब अनेक प्रसंगांमद्धे उपयुक्त ठरतं तसंच एका प्रसंगामध्ये अनेक कौशल्यांचा एकत्रित उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ आपलं म्हणणं मित्रांना पटवून द्यायला संवादाचं कसब लागतं, तसंच ते नोकरीसाठी मुलाखत देताना किंवा वाट चुकल्यावर पत्ता विचारतानाही लागतं. परीक्षेची तयारी करताना अनेक जीवनकौशल्यांचा एकत्रित वापर करायला लागतो- आपली कुवत काय, कुठपर्यंत झेप घ्यायची आहे, त्यासाठी कसंकसं नियोजन करायला लागेल, तणावाला काबूत कसं ठेवायचं, अभ्यासाची कुठली तंत्रं वापरायची, पुस्तकातले कुठले भाग गाळता येतील, घरातल्यांचं सहकार्य कसं मिळवायचं आणि जो काही निकाल लागेल त्याला कसं तोंड द्यायचं!

‘नाही’ म्हणायचं संवादकौशल्य घेऊ. कुठे कुठे आवश्यक असतं ते मुलांना? दोस्तांच्या दबावाला बळी पडू नये यासाठी, प्रेमाच्या नकोशा आविष्काराला थोपवण्यासाठी, व्यसनांच्या अधीन होऊ नये म्हणून, असुरक्षित लैंगिक संबंध टाळण्यासाठी,.. यातली बहुतेक आव्हानं किशोरवयीन मुलांना येतात तेव्हा आईबाबा आसपास नसतात. त्यांच्यावर पटकन निर्णय घेण्याचा दबाव असतो. पण दूरगामी विचार करण्याची शक्ति विकसित झालेली नसते आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व स्थापित करण्याची निकड तर भासत असते. नंतर पालकांच्या होणाऱ्या दोषारोपांपेक्षा ताबडतोब मिळणारी दोस्तांची मान्यता वरचढ ठरते. त्या आणीबाणीच्या प्रसंगात या सगळ्या भावनिक कल्लोळाला तोंड देऊन निर्णयापर्यंत पोचणं त्यांच्या अपरिपक्व मेंदूला झेपणं अवघडच असतं. म्हणूनच या अधोरेखित केलेल्या जीवनकौशल्यांनी त्यांना सक्षम करायला हवं.   

टीनएज प्रेग्नन्सी, हिंसाचार, व्यसनं, सामाजिक कौशल्यांचा अभाव, माध्यमांचा अतिरेक आणि बिघडलेलं मन:स्वास्थ्य अशा असंख्य अडचणींशी आजची पिढी झगडतेय. पेपरमध्ये मन सुन्न करणाऱ्या बातम्या वाचल्या की दरवेळी भीतीची आणि रागाची लहर अंगात उठते. पालक म्हणून आपण कुठेकुठे पुरे पडणार, अशी असहाय्यतेची भावना मनात येते. आपल्या मुलांच्या वर्तमान आणि भविष्याविषयी काळजी वाटायला लागते. समाज म्हणून याचा एकत्रित सामना करणं आवश्यक आहेच, आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. पण बाह्य जगाला बाधित केलेल्या या विषावर वैयक्तिक पातळीवर जीवनकौशल्यं शिकवून उतारा शोधता येईल का? सुदैवानं आत्तापर्यंत झालेलं संशोधन याला दुजोरा देतंय.

आणि हो, किशोरवयीन मुलांच्या पालकांना स्वत:साठी यांचा उपयोग आहेच की! आयुष्याच्या मध्यावर पोचल्यावर त्यांनाही काही कमी आव्हानं नसतात. भावनिक उद्रेकांपासून स्वत:ला वाचवायची त्यांनाही गरज असते. नात्यांच्या गुंता सोडवायचा असतो. आर्थिक, शारीरिक अडचणींना तोंड द्यायचं असतं. एक बरंय की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर जीवनकौशल्यं शिकता येतात. ती कशी शिकायची आणि शिकवायची हा एक खूप मोठा आणि स्वतंत्र विषय आहे. त्याविषयी पुनः केव्हातरी.   

 

  किशोरवय आणि जीवनकौशल्यं डॉ वैशाली देशमुख पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि...