Monday, 24 July 2017

लग्न - To Do or Not to Do! - Part 2





     एकदा एक वस्तीत रहाणा-या मायलेकी माझ्याकडे आल्या होत्या. दहावी झालेली ती मुलगी अतिशय हुशार होती. तिला पुढे शिकायची फार इच्छा होती. घरकाम करणा-या तिच्या आईचा मात्र याला सक्त विरोध होता. ‘इथपर्यंत शिकवलं, आता मुलीला वेळेवर उजवून टाकलेलं बरं.’ त्या म्हणाल्या.

Image result for question mark‘असं का म्हणता मावशी? पोरगी एवढी हुशार आहे. इतक्यात कशाला लग्न?’ मी मध्यमवर्गीय आर्ग्युमेंट केलं.

‘अहो ताई, मी दिवसभर कामाला जाते. आमची वस्ती काही फार चांगली नाही. तरण्याताठ्या पोरीला एकटं ठेवायचा म्हणजे जीवाला घोर. आपापल्या घरी सुखरूप गेली एकदा म्हणजे मी सुटले.’

लग्नाचं हेही कारण असू शकतं?

मागच्या वेळी आपण शमिकाच्या बाबतीत बोललो. ती गोंधळून गेलीये आजूबाजूच्या लग्नांचं जे चित्र पाहिलंय त्यामुळे.  एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती फेकून द्यायची, तोडून टाकायची अशीच तिला सवय लहानपणापासून. मग का हे लग्न झालेले लोक तडजोड करत राहतात? टाकायचं तोडून. कित्येकदा तर ती तिच्या आईलाही म्हणते कि ‘अगं, का ऐकून घेतेस तू  सगळ्यांचं? मी असते तर केव्हाच निघून गेले असते.’ आई म्हणते, ‘तुला नाही कळायचं. प्रत्येक गोष्टीचा ढाल-तलवार घेऊन तुकडा पडायचा नसतो. काही ठिकाणी माघारही घ्यावी लागते.’

शामिकाची आत्या तिची अत्यंत लाडकी. स्वतंत्र वृत्तीच्या या आत्यानं पस्तीशी पर्यंत लग्न नाही केलं. त्यानंतर तिचं लग्न झालं. शामिकानं विचारल्यावर ती म्हणाली, ‘मला कंटाळा आला होता लोकांच्या त्याच त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायचा. कुठेही गेलं कि ते एका दयार्द्र दृष्टीनं बघायचे, ‘बिच्चारी!’ म्हणून. आणि एकटेपणा नको वाटायला लागला गं!’

तसं बघायला गेलं तर गेल्या कित्येक पिढ्यांपासून लोक लग्न करतात. त्यात प्रश्न पडण्यासारखं किंवा विचार करण्यासारखं काही असेल असं कुणाला वाटतही नसे. लहान असतानाच, अगदी पाळण्यातसुद्धा लग्नं व्हायची.


लग्नाची प्रथा एक सोय म्हणून चालू झाली. पण ती नुसती सोय नाही, एक सिम्बायॉटीक रिलेशनशिपही आहे. म्हणजे दोघांनाही त्यातून फायदा व्हायला हवा, हो ना? पण जेव्हा हे फायद्याचं पारडं कुणा एकाच्या बाजूला झुकतं तेव्हा ते नकोसं वाटायला लागतं. आणि जेव्हा अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसायला लागतात तेव्हा ‘नको रे बाबा लग्न!’ असं का वाटू नये एखाद्याला?

लग्न करण्याचे फायदे-तोटे यावर नको जायला आपली चर्चा. पण तुमच्या जनरेशनला ‘लग्न नको’ असं का वाटत असेल हे तरी बघायला हवं. यातले काहीजण असे असतात कि जे नाईलाज म्हणून लग्नाशिवाय रहातात. पण आपण बोलणार आहोत ते अविवाहित रहाण्याचा निर्णय जाणून-बुजून घेणा-यांविषयी.


आजच्या तरुणांचं म्हणणं आहे कि सिंगल रहाणं हा त्यांचा चॉईस आहे, असहायता, किंवा नाईलाज नाही. तशी आपल्या भारत देशात थोर व्यक्तींनी लग्न न करण्याची परंपरा आहेच. ज्ञानेश्वर, विवेकानंदांपासून, ते आजच्या रतन टाटांपर्यंत, आणि जयललितांपासून ते सुश्मिता सेन पर्यंत. ए पी जे अब्दुल कलाम तर म्हणत कि मी लग्न केलं असतं तर एक तरी रॉकेट लाँच केलं असतं कि नाही कोण जाणे! या लोकांच्या समोर कार्याचा इतकं ढीग असतो कि लग्न वगैरेचा विचारच करत नाहीत ते.

काहीजणांना लग्नाची चक्क भीती वाटते. नवरा-बायकोच्या नात्यातला हळुवारपणा, गोडवा, समाधान अशा पॉझीटीव्ह गोष्टी तुमच्या जनरेशन पर्यंत पोचल्या नाहीयेत समहाऊ. आदर्श, आनंदी कुटुंबाची चित्रं प्रत्यक्षात फारशी दिसतच नाहीत. काही वेळा स्वत:ला एखादा नकोसा अनुभव आलेला असतो. लहानपणी झालेलं लैंगिक शोषण असेल, प्रेमभंग असेल किंवा अब्युझीव्ह रिलेशनशिप असेल, कुणाकडून फसवलं गेलं असेल किंवा यातलं काहीही नसलं तरी अज्ञाताची भीती असेल. आजूबाजूची अनेक लग्न डिव्होर्समध्ये संपलेली पाहिली कि लग्न ही एक क्षणभंगुर गोष्ट आहे याची पक्की खात्री होते. हा डिव्होर्स ही काही एक घटना नसते, ती नकोशा घटनांची मालिका असते. वाद, भांडणं, पैशाचा चुराडा आणि मधल्या मध्ये होणारी मुलांची कुचंबणा.


जपान काय किंवा अमेरिका काय, बहुतेक सगळ्या पुढारलेल्या देशांत अधिकाधिक लोक लग्न न करण्याचा निर्णय घ्यायला लागलेत. आधी पाहिलेल्या कारणांपेक्षा वेगळं असं याचं एक कारण तज्ज्ञांना असं वाटतंय कि मुलं आपल्या किशोरावस्थेतून बाहेरच यायला तयार नाहीयेत. त्यांना तेच निवांत, जबाबदारी नसलेलं आयुष्य बरं वाटतंय. जे वेळेवर मॅच्युअर होतात ते वयाच्या विशीत लग्न करतात. त्यानंतर मग ही शक्यता कमी कमी होत जाते.

यावर मग एखादा मधला तोडगा काढला जातो, तो म्हणजे लिव्ह-इन रिलेशनशिपचा. कित्येकदा भेटलेल्या व्यक्तीचा पुरेसा अंदाज येत नाही. त्या व्यक्तीच्या आवडी-निवडी, सेक्शुअल प्रेफरन्सेस, स्वभाव... एकदम लग्न करून मग पश्चाताप करण्यापेक्षा हे बरं असं वाटतं. निदान कायद्याच्या किचकट गुंत्यातून तरी सुटका होते. शिवाय लाँग टर्म कमीटमेंटची गरज नाही.


या सगळ्या ट्रेंडचे काही धोके आहेत. समाजशास्त्रज्ञांच्या मते हे कुटुंबव्यवस्थेला आणि पर्यायानं सोसायटीला घातक आहे. कुटुंबात आई-बाबा असे दोन्ही पालक असणं मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतं. ते कसं साधणार? शिवाय आधीच एकटा होत चाललेला माणूस कदाचित जास्त एकलकोंडा होईल. आजारपणं, म्हातारपण या ज्या गोष्टी कुटुंबात एकमेकांच्या आधारानं पार पडतात त्या निपटण्यासाठी हॉस्पीटल्स, नर्सेस, आधार देणा-या संस्था अशी सोय करायला लागेल ती वेगळीच.



म्हणजे दिसतो तितका साधा नाहीये हा निर्णय!


( Published in Viva Loksatta June 2017)

Monday, 17 July 2017

लग्न - To Do or Not to Do!




Image result for question mark      एका पार्टीत दोन बायका गप्पा मारत असतात. एक दुसरीला विचारते, ‘तुझा नवरा तुला सुखात ठेवतो का ग?’ जवळच असलेल्या नवरोबांचे कान तिकडेच असतात. उत्तर काय असणार याची खात्री असते त्याला. पण बायको म्हणते, ‘नाही.’ तिचं हे धक्कादायक उत्तर ऐकून तो चक्रावतो. सगळीकडे सन्नाटा पसरतो. ती पुढे म्हणते, ‘नो, ही डझन्ट मेक मी हॅपी, आय अॅम हॅपी. त्यानं मला सुखी करायची गरज नाही. ती  जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी माझी मीच सुखी आहे.’ 
कुठेतरी वाचलेली ही गोष्ट. यशस्वी लग्नाचं सिक्रेट सांगणारी. नक्की कुणासाठी आणि कशासाठी करतो आपण लग्न? हे असं कुणीतरी आपल्याला सुखात ठेवावं म्हणून? कि एक रिवाज म्हणून? की समाजात मानानं जगता येण्यासाठी? कंटाळा आला म्हणून कि वेळ जात नाही म्हणून? खरंतर लग्न करावं कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ही गोष्ट इतकी समाजमान्य झाली आहे कि तो प्रश्न अगदी सार्वजनिक बनून जातो. शिक्षण संपलं, नोकरी लागली, मग आता पुढे काय? तर लग्न!

 शामिकाच्या घरात सध्या याच कारणावरून वाद चालू आहे. ती दोन वर्षांपूर्वी आर्किटेक्ट झाली. तिचं काम बघून तिला एका चांगल्या फर्ममध्ये नोकरीही मिळाली. आपल्या कामावर ती जाम खूश आहे. नवनवीन प्रोजेक्ट्स, चॅलेन्जेस, अचिव्हमेंट्स यात ती अगदी बुडून गेलीये. उरलेल्या वेळात मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाणं, मोबाइलवर चॅटिंग यात ती बिझी असते. घरच्यांच्या वाट्याला ती फार कमी वेळ येते. आजकाल तर ती मुद्दामहूनच टाळते आपल्याला असं वाटायला लागलंय आईबाबांना.
  नातेवाईकांनी, ओळखीच्यांनी आईबाबांना विचायायला सुरुवात केली यंदा कर्तव्य आहे का म्हणून. घरात आजीही असते. तिला कळतच नाहीये आता शामिका लग्न का करत नाहीये ते. ‘झालं ना गं शिकून? मग आता काय? प्रत्येक गोष्टीची वेळ असते!’ मधेच कुणाच्या तरी लग्नाची पत्रिका येते. नाहीतर शामिकाच्या एखाद्या मैत्रिणीचं लग्न ठरल्याची बातमी येते. अशा वेळी ही चर्चा आणखीनच तीव्र होते.   
 ‘मावशी, तू एक दिवस येऊन बघ आमच्या घरी, तुलाही बोअर होईल. तुला माहितेय का, जेव्हा बघावं तेव्हा आमच्या घरी लग्नाचा विषय चालू असतो. जणूकाही जगात दुसरे कोणते विषयच नाहीत. खरंतर माझ्या डोक्यातही नाहीये असलं काही आत्ता. काय घाई आहे? बघू ना नंतर कधीतरी! तसं बघायला गेलं तर प्राणी कुठे करतात लग्न? आदिमानव काय लग्न करायचा? आणि लग्न झालं म्हणून लोक सुखी होतात का?’ शामिकाकडे बिनतोड मुद्दे तयार आहेत वादासाठी.
आईबाबांनी शेवटी वैतागून विचारलं, ‘मग, काय म्हणणं आहे तुझं? लिव्हिंग-इन वगैरेचा विचार करतेयस का? पण मुलं होणार असतील तर त्यासाठी तरी लग्न आवश्यक आहे हे पटतंय का तुला? त्या बिचा-या मुलांना का तुमच्या विचारांची शिक्षा?
‘नॉट रियली. ही अशी कुणाला कमीटमेंट देणंच अवघड वाटतंय मला. कॅज्युअल डेटींग वगैरे ठीक आहे, पण इतकं माझं आयुष्य मला नाही शेअर करायचंय कुणाबरोबर आत्तातरी. शिवाय लग्न केलं कि झालं असं कुठे असतं? लगेच लोक मुलाबिलांची चौकशी करायला सुरुवात करतात. आत्ता तुम्ही सुद्धा तेच केलंत. आपण लग्नाविषयी बोलत होतो तर तुम्ही मुलांवरच घसरलात. माझ्या काही मैत्रिणींचं बघतेय ना मी. त्या अशाच घरच्यांच्या आग्रहाला बळी पडल्या. लग्न झाल्यावरही करता येतं करियर असं त्या मला सांगायच्या. पण आता म्हणजे ‘विसरा आता करीयर वगैरे’ अशी स्थिती झालीये त्यांची.’  

लग्नाच्या विषयाकडे आजचे तरुण वेगळ्या नजरेनं बघतायत. ‘काय गरज आहे लग्नाची? सगळ्यांनी लग्न करायलाच हवं का? लग्न करणं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का? आणि स्वत:च्या आनंदासाठी, सुखासाठी म्हणून जर लग्न करायचं असेल तर त्यासाठी नवरा कशाला हवा? मी भरपूर कमावते, मला हवं ते करायला कुणाची बंदी? हं, कदाचित म्हातारपणी मला एकटं वाटेल. पण तेव्हाचं तेव्हा पाहू. मनात येईल ते करण्याचं स्वातंत्र्य गमावून कुणाचं तरी घर सांभाळण्याचं काम करण्यात काय अर्थ आहे? आजकाल तर लग्न करण्यापूर्वीच प्री-नप्शिअल अग्रीमेंट करतात. उगाच पटलं बिटलं नाही तर नन्तर काही भानगड नको.’

शामिकाला जी भीती वाटतेय त्यात कितपत तथ्य आहे? आणि ही भीती फक्त करीयरविषयीच आहे का? यातला कुठलाही नियम जनरलाइज करता येतो का? कमीटमेंट, स्वातंत्र्य, मुलं, जास्तीच्या जबाबदाऱ्या, अशा अनेक गोष्टींचं तिला टेन्शन आहे, ते का? पूर्वी नव्हत्या का या गोष्टी? आजच्या जमान्याच्या टोकाच्या स्वकेंद्रित जगण्याचं हे प्रतिबिंब आहे का? कि लग्न ही संस्थाच आता आउटडेटेड व्हायला लागलीय? मग कुटुंबसंस्थेचं भविष्य काय? आणि कुटुंबाच्या युनिट वर अवलंबून असलेल्या सोसायटीचं काय? या बदलत्या विचारप्रवाहात ती टिकून राहणार का?

तुम्हांला काय वाटतं? 

(Published in Viva Loksatta June 2017)

  किशोरवय आणि जीवनकौशल्यं डॉ वैशाली देशमुख पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि...